त्या वादग्रस्त वक्तव्यावर बंडातात्या कराडकर यांनी मागितली माफी...
बंडातात्याना पोलिसांनी घेतले ताब्यात.
सातारा दि.४
सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावरुन राज्यात वातावरण तापलेलं असतानाच वारकरी संप्रदायातील एक चर्चित व्यक्तीमत्त्व बंडातात्या कराडकर यांनी या वादात उडी घेत बंडातात्या कराडकर यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करताना सर्वच राजकीय नेत्यांची मुलं दारु पित असल्याचं सांगत पुरावे असल्याचाही दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे वातावरण आणखीनच चिघळलं. गुरुवारी सकाळी सातारा येथे त्यांनी हे वक्तव्य केले होते.
मात्र वातावरण वाढत चालल्याचं पाहून बंडातात्या यांनी माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यानं भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असं बंडातात्या यांनी म्हटलं आहे.बंडातात्या यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वाद चिघळलेला असताना सातारा शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता पुढे काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बंडातात्याविरुद्ध पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. गुरुवारी पोलिसांनी बंडातात्यांच्या दोन्ही मठांवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यानंतर आज शुक्रवारी सकाळपासून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आणि मठातून बंडातात्या यांना ताब्यात घेण्यात आले.
ज्यांच्याविषयी मी बोललो त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क केला आहे. त्यामुळे जर माझे वक्तव्य चुकले असेल तर मी माफी मागतो. माफी मागण्यात कमीपणा कसला? पत्रकारांनी माझ्या वक्तव्याचे भांडवल केले. पत्रकारांनी आता विषय वाढवू नये, असं बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे.
बंडातात्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महिला आयोग चांगलंच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. बंडातात्यावर कडक कारवाई करण्याची मागणी महिला आयोगाकडून केली जात आहे.