Friday, January 16, 2026

निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.

 निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री. 



पुरंदर :

      पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहीरे जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादीचा पारंपरिक गड, मागील निवडणुकीत शिवसेनेने निर्विवादपणे ताब्यात घेतला होता. त्याची पुनरावृत्ती यावेळी हे होण्याच्या आशा निर्माण झाली आहे. माजी पंचायत समिती सभापती अतुल म्हस्के यांच्या पत्नी भारती अतुल म्हस्के या शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रबळ दावेदार झाल्या आहेत तर, कोळविहीरे गुळूंचे गणातून कर्नलवाडीच्या उपसरपंच स्वप्नाली विराज निगडे या प्रमुख दावेदार झाल्या आहेत. तसेच निरा वाल्हा गणातून निरेतील ताकदवान उमेदवाराची चाचपणी शिवसैनिकांकडून सुरू आहे. 


      नावळी येथील अतुल म्हस्के हे शिवसेनेचे खंदे समर्थक म्हणून गणले जातात. पुरंदरच्या पाणी प्रश्नासाठी पोलीसांच्या काठ्या व तुरुंगवास भोगलेले कणखर नेतृत्व म्हणून सुपरिचित आहे. या कष्टाचे चिज मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत सभापतीपदी विराजमान झाल्यावर झाले होते. माजी राज्यमंत्री व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्या विश्वासू सहकार्यांपैकी एक नाव अतूल म्हस्के यांचे येते. त्यांच्या पत्नी भारती यांना जिल्हा परिषदेच्या निरा कोळविहीरे मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने उमेदवारी मागतली असुन उद्याच्या बैठकीत त्यांचे टिकिट फिक्स करण्याचा आग्रह मतदारसंघातील बहुतांश शिवसैनिकांनी लावून धरला आहे. 


   कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेचे विराज निगडे यांनी मोर्चेबांधणी केली होती. शिवसेनेच्या सुवर्णा तानाजी महानवर यांना थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत खंबीर साथ देत, भरघोस मतांनी निवडून आणले आहे. विराज निगडे यांच्या पत्नी स्वप्नाली निगडे या सदस्य म्हणून १५० हुन अधिक मतांनी निवडून आल्या होत्या. आता या दोघी शिवसेनेच्या वतीने कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच म्हणून यशस्वीपणे गावचा कारभार चोख संभाळत आहेत. स्वप्नाली निगडे यांची वक्तृत्वावर प्रचंड मजबूत पकड असुन, महिला संघटना ही दमदार आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सहकार्य, नवरात्र उत्सव साजरा करणे, महिलांच्या आरोग्यासाठी शिबिरांचे आयोजन, गावातील विविध विकासकामान मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.‌ 


      जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वाल्हे येथील सागर भुजबळ यांच्या पत्नी यांनी शिवसेनेची उमेदवारी मागितली आहे. वाल्हे हे जिल्हा परिषद गटातील सर्वात जास्त मतदार संख्येचे व ओबीसी मतदारांचे गाव असून, भुजबळ या निवडणुकीत प्रभाव टाकू शकतात. 


  वाल्हे निरा पंचायत समितीचे आरक्षण एस.सी. साठी आहे. या जागेवर वाल्हेच्या रोहित भोसले यांच्या पत्नी, पिंपरे खुर्दचे विश्वजीत सोनवणे यांच्या पत्नी प्रमुख दावेदार असुन निरा शहरातील तगडा उमेदवार शिवसेनेच्या वतीने या निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याची जोरदार तयारी स्थानिक शिवसैनिकांनी लावून धरली आहे. 


   कोळविहिरे गुळूंचे गणातून जवळार्जूनच्या शितल सतिश साळूंखे, साकुर्डेचे दादा थोपटे यांच्या कुटुंबातील महिला सदस्य, दौंडजच्या सरपंच अल्का महादेव माने, राखचे अजय रणनवरे यांच्या पत्नी ही पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने इच्छूक उमेदवार आहेत. 


      या सर्व उमेदवारांना उद्या शनिवारी सासवड येथे होणाऱ्या बैठकीला बोलवले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. उद्या बैठकीत उमेदवारांच्या नावांची घोषणा वरिष्ठांकडून होणार असल्याचे ही सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेना उमेदवार निवडणुकीच्या कामाला थेट सुरवात करुन प्रचारात आघाडी घेतील अशी आशा आहे. 

Thursday, January 15, 2026

लग्नाच्या आनंदात शिक्षणाची देणगी; वरात टाळून शाळा विकासासाठी नवदांपत्याचे प्रेरणादायी पाऊल

 लग्नाच्या आनंदात शिक्षणाची देणगी; वरात टाळून शाळा विकासासाठी नवदांपत्याचे प्रेरणादायी पाऊल 



पुरंदर :

      खर्चिक वरात, आहेर-भेटवस्तूंच्या ऐवजी सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श पिसुर्टी (ता. पुरंदर) येथील नवदांपत्याने घालून दिला. लग्नाच्या निमित्ताने ज्या शाळेने आयुष्याला आकार दिला, त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विकासासाठी रोख देणगी देत राहुल व प्राजक्ता यांनी समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण सादर केले. 



         लग्न म्हणजे केवळ वैयक्तिक आनंदाचा क्षण नसून समाजाशी नाते जपण्याची संधी असल्याचे पिसुर्टी येथील राहुल व प्राजक्ता यांनी कृतीतून दाखवून दिले. आपल्या शुभविवाहाच्या आनंदात वरातीचा खर्च टाळत त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिसुर्टी या आपल्या बालपणाच्या शाळेसाठी ₹५,००१/- इतकी रोख देणगी शाळा विकासासाठी दिली. देणगी स्वीकारताना नवदांपत्याने गुरुजनांना नमस्कार करून शुभाशीर्वाद घेतले. 


      राहुल हे कै. साधू भिमाजी बरकडे (पाटील) यांचे नातू व श्री. बाळू साधू बरकडे (पाटील) यांचे कनिष्ठ चिरंजीव असून, प्राजक्ता या श्री. राजेंद्र सुभाष घरबुडे यांच्या कनिष्ठ कन्या आहेत. सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी करमाळा येथील एकदंत मंगल कार्यालयात त्यांचा शुभविवाह संपन्न झाला. यापूर्वी रविवारी साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम पार पडला.



“आहेर व भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत” अशी स्पष्ट विनंती करत नवदांपत्याने सामाजिक भान जपले. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, शिक्षकवर्ग व शिक्षणप्रेमींनी कौतुक केले असून, विवाह समारंभातून समाजोपयोगी कार्याचा नवा पायंडा पडल्याची भावना व्यक्त होत आहे.

Tuesday, January 13, 2026

राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान

 राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर

१६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान



मुंबई :

        राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून जालना, पुणे, सोलापूर, परभणी, कोल्हापूर, बीड, सातारा, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली व धाराशिव या १२ जिल्ह्यांत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणाला पुन्हा एकदा वेग येणार आहे.

           निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. अर्ज छाननीनंतर २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

         या निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार असून, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

          दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील विकासाच्या प्रश्नांना पुन्हा एकदा राजकीय व्यासपीठ मिळणार आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून, उमेदवार निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे.

           या निवडणुकांकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, ग्रामीण सत्तासमीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.

Sunday, January 11, 2026

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व



बारामती :

बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पार पडणाऱ्या ‘कृषी 2026’ कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागले आहे. एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन यंदा तब्बल आठ दिवसांचे असणार असून, मागील वर्षी मिळालेल्या विक्रमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील प्रदर्शनाला दररोज सुमारे ७० हजार शेतकऱ्यांनी भेट दिली होती.

या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन १७ जानेवारी रोजी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होणार असून, यावेळी देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या निमित्ताने बारामतीत पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.

या प्रदर्शनाबाबत माहिती देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, कृषी 2026 हे केवळ प्रदर्शन नसून, शेतीच्या भविष्याची दिशा ठरवणारे व्यासपीठ आहे. यंदा या प्रदर्शनात अनेक बदल आणि नावीन्यपूर्ण प्रयोग शेतकऱ्यांना अनुभवता येणार आहेत.

या प्रदर्शनातील पाच ठळक बाबी विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

पहिली आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘स्मार्ट शेती’. भारतात पहिल्यांदाच शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर कसा करता येतो, याचे जिवंत प्रात्यक्षिक येथे पाहायला मिळणार आहे. पीक नियोजन, उत्पादन वाढ, खर्च नियंत्रण आणि अचूक निर्णय यासाठी AI कसे उपयुक्त ठरू शकते, हे शेतकऱ्यांना समजणार आहे. भारतीय शेती ‘स्मार्ट युगात’ प्रवेश करत असल्याचे हे ठळक उदाहरण असल्याचे राजेंद्र पवार यांनी सांगितले.



दुसरी मोठी क्रांती म्हणजे ऊस उत्पादनात झालेली अभूतपूर्व वाढ. या प्रदर्शनात एकरी तब्बल २०० टन उत्पादन देणाऱ्या उसाचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. तसेच साधारण ५० टन उत्पादन देणारा खोडवा ऊस योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने १५० टनांपर्यंत कसा वाढवता येतो, हेही प्रत्यक्ष दाखवले जाणार आहे. यासोबतच मका, कांदा, तूर आणि केळी यांसारख्या पिकांची आधुनिक प्रात्यक्षिकेही शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत.

तिसरी बाब म्हणजे भीमथडी घोड्यांचे पुनरुज्जीवन. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या देशी जातीला एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. वेग, ताकद आणि चपळतेसाठी प्रसिद्ध असलेला भीमथडी घोडा ‘घोड्यांमधील फरारी’ म्हणून ओळखला जातो. ही केवळ पशुसंवर्धनाची नव्हे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची जपणूक असल्याचे चित्र येथे पाहायला मिळणार आहे.

चौथी बाब म्हणजे भरडधान्यांचा बदललेला प्रवास. एकेकाळी गरिबांचे अन्न मानले जाणारे भरडधान्य आज आरोग्यदायी आहार म्हणून श्रीमंतांच्या ताटात पोहोचले आहे. या बदलाचा वेध घेत प्रदर्शनात विविध भरडधान्ये आणि त्यावर आधारित आधुनिक प्रक्रिया केलेले पदार्थ, जसे की भरडधान्याची स्पॅगेटी, शेतकरी व तरुण पिढीसमोर मांडण्यात येणार आहेत.



पाचवी आणि महत्त्वाची बाब म्हणजे जागतिक तंत्रज्ञानाचा संगम. इस्रायल, नेदरलँड्स, चीन, ब्राझील, जर्मनीसह १५ ते २० देशांतील अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान या प्रदर्शनात एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सोलर पॉलीहाऊस, हायड्रोपोनिक्स, रोबोटिक शेती यांसारखी प्रात्यक्षिके शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत.



थोडक्यात सांगायचे तर, ‘कृषी 2026’ हे केवळ कृषी प्रदर्शन नसून, भारतीय शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी उघडलेली एक नवी दारे आहेत. या प्रदर्शनाचा लाभ शेतकरी, युवक आणि सर्वसामान्यांनी घ्यावा, असे आवाहन राजेंद्र पवार यांनी केले आहे.

Thursday, January 8, 2026

वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई; शेळी-बोकड चोरी करणारी टोळी जेरबंद

 

वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई; शेळी-बोकड चोरी करणारी टोळी जेरबंद, १२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त



बारामती | प्रतिनिधी


बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या शेळ्या व बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १२ लाख ९५ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून टोळीतील एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

शेळी-बोकड चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले होते. याची दखल घेत वडगाव निंबाळकर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून अशोक बाबुराव जाधव याला अटक केली. या टोळीतील आणखी दोन आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या अशोक बाबुराव जाधव याच्यावर वडगाव निंबाळकर, लोणंद आणि हडपसर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडील पिक-अप वाहनाची तपासणी केली असता २ तलवारी, ३ कोयते, १ लोखंडी रॉड, १ स्क्रू ड्रायव्हर, १ तार कटर, १ चाकू, १ लाकडी काठी आणि १ प्लास्टिक पाईप असा घातक मुद्देमाल जप्त करण्यात आला.


ही टोळी इतरही गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू असल्याचे वडगाव निंबाळकर पोलिसांनी सांगितले आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Tuesday, January 6, 2026

"विस्तव तळहातावर घेऊनही निर्भय पत्रकारिता सुरू आहे" : भरत निगडे नीरा कन्या विद्यालयात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा

"विस्तव तळहातावर घेऊनही निर्भय पत्रकारिता सुरू आहे" : भरत निगडे 


नीरा कन्या विद्यालयात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा 



नीरा :

    “पत्रकारितेचा विस्तव आम्ही तळहातावर घेऊन आमच्या ग्रामीण भागातील पत्रकारांची सुरू आहे. तो विस्तव भाजत असला, तरी चेहऱ्यावर वेदना दाखवणार नाही. पत्रकारिता हा आमच्यासाठी केवळ व्यवसाय नसून आनंदाने स्वीकारलेले व्रत आहे. परिणामांची पर्वा न करता समाजातील चांगल्या-वाईट घटना निर्भयपणे लोकांसमोर मांडणे, हाच आमच्या पत्रकारितेचा खरा उद्देश आहे.” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी केले. 



     पुरंदर तालुक्यातील नीरा येथील सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यामंदिर येथे मंगळवारी (ता. ६) मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकारांचा शाल व गुलाबाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. 


         यावेळी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभाग सल्लागार समिती सदस्य लक्ष्मणदादा चव्हाण, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गांधी, ॲड. आदेश गिरमे यांच्यासह नीरा परिसरातील ज्येष्ठ व युवा पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास पत्रकार बाळासाहेब ननावरे (पुढारी), भरत निगडे (लोकमत), रामदास राऊत (केसरी), राहुल शिंदे (प्रभात), किशोर कुदळे (सकाळ), महम्मदगौस आतार (सामना), सुभाष जेधे (मराठी रोखठोक), विजय लकडे पुरंदर रिपोर्टर), अमोल साबळे (रिपब्लिकन भारत), महेश जेधे, सचिन मोरे यांच्यासह विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला माने व पर्यवेक्षिका अनुराधा उरमोडे उपस्थित होत्या. 



      पत्रकार भरत निगडे यांनी पत्रकारांचे समाजातील स्थान स्पष्ट केले. तर सुभाष जेधे, महेश जेधे आणि अमोल साबळे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत पत्रकार दिनाचे महत्त्व आपल्या ओघवत्या शैलीत मांडले. ॲड. आदेश गिरमे यांनी पत्रकारांना शुभेच्छा देत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. 



     कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या उपशिक्षिका शिवाई मधे यांनी केले. आभार मुख्याध्यापिका निर्मला माने यांनी केले. पत्रकारांच्या समाजप्रबोधनातील योगदानाचा सन्मान करण्याचा आनंद विद्यालयाला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी खोपे व माया गायकवाड यांनी केले. 


        कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार महेश जेधे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थिनींना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. किरण शेटे, कुणाल खैरकार, अनिल कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. 

---

Monday, January 5, 2026

दर्पण ते ‘गोदी मीडिया’ : माध्यमांच्या अधोगतीचा प्रवास

 

दर्पण ते ‘गोदी मीडिया’ : माध्यमांच्या अधोगतीचा प्रवास 



मुंबई : 

      ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू केले. या ऐतिहासिक घटनेला उद्या १९४ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी पत्रकारितेचा तो जन्मकाळ केवळ माध्यमाचा आरंभ नव्हता, तर सामाजिक, वैचारिक आणि राष्ट्रीय जागृतीचा प्रारंभ होता. 


      दर्पण सुरू झाले तेव्हा देश पारतंत्र्यात होता. इंग्रज सत्तेच्या जोखडाखाली दबलेल्या समाजाला जागे करण्याचे, शिक्षित करण्याचे आणि अन्यायाविरुद्ध उभे करण्याचे महत्त्वाचे काम त्या काळातील पत्रकारांनी आपल्या लेखणीतून केले. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक क्रांतिकारक हे पत्रकारही होते. पत्रकारिता ही तेव्हा मिशन होती, धंदा नव्हता. लेखणी ही तलवार होती आणि वृत्तपत्रे ही परिवर्तनाची रणभूमी होती. 


        स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजकीय व सामाजिक रचनेत बदल झाले, तसेच माध्यमांचे प्राधान्यक्रमही बदलत गेले. लोकशिक्षण हे माध्यमांचे मूलभूत उद्दिष्ट हळूहळू मागे पडले. त्याजागी लोकरंजन आले आणि आज दुर्दैवाने माध्यमांची वाटचाल सत्तानुनय या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. 


       आज अनेक भांडवलदारी माध्यमांना सत्ताधाऱ्यांभोवती आरत्या ओवाळणे, त्यांच्या चुका झाकणे, प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे, एवढेच आपले काम असल्याचा भ्रम झालेला दिसतो. सत्तेला आरसा दाखवण्याऐवजी आरशालाच वाकवण्याचे काम माध्यमांकडून सुरू आहे. 


        यातूनच “गोदी मीडिया” ही ओळख माध्यमांना मिळाली आहे. ही ओळख कोणतेही भूषण नाही; ती लाजीरवाणी आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची ही अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. 


      मात्र या अंधारातही काही आशेचे किरण आहेत. आजही असंख्य पत्रकार सत्यासाठी लढत आहेत. लोकशाही, संविधान, माध्यम स्वातंत्र्य यांचे रक्षण करण्यासाठी आपली लेखणी झिजवत आहेत. धर्मांध, फूट पाडणाऱ्या शक्तींविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत आहेत. त्यांच्यावर दबाव आहे, धमक्या आहेत, आर्थिक असुरक्षितता आहे; तरीही ते माघार घेत नाहीत. 


      अशा पत्रकारांना केवळ शुभेच्छाच नव्हे, तर समाजाच्या सहकार्याची, पाठिंब्याची नितांत गरज आहे. किमान सुबुद्ध जनतेने तरी सत्य बोलणाऱ्या पत्रकारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. कारण पत्रकारिता वाचली तरच लोकशाही वाचेल. 


       पत्रकार दिनाच्या निमित्ताने या संघर्षरत, निर्भीड आणि प्रामाणिक पत्रकारांना सलाम. 


पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा! 


— एस. एम. देशमुख

मुख्य विश्वस्त

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई

---

Featured Post

निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.

 निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.  पुरंदर :       पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहीरे जिल्हा परिषद ...