Sunday, January 11, 2026

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व



बारामती :

बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पार पडणाऱ्या ‘कृषी 2026’ कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागले आहे. एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन यंदा तब्बल आठ दिवसांचे असणार असून, मागील वर्षी मिळालेल्या विक्रमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील प्रदर्शनाला दररोज सुमारे ७० हजार शेतकऱ्यांनी भेट दिली होती.

या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन १७ जानेवारी रोजी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होणार असून, यावेळी देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या निमित्ताने बारामतीत पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.

या प्रदर्शनाबाबत माहिती देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, कृषी 2026 हे केवळ प्रदर्शन नसून, शेतीच्या भविष्याची दिशा ठरवणारे व्यासपीठ आहे. यंदा या प्रदर्शनात अनेक बदल आणि नावीन्यपूर्ण प्रयोग शेतकऱ्यांना अनुभवता येणार आहेत.

या प्रदर्शनातील पाच ठळक बाबी विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

पहिली आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘स्मार्ट शेती’. भारतात पहिल्यांदाच शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर कसा करता येतो, याचे जिवंत प्रात्यक्षिक येथे पाहायला मिळणार आहे. पीक नियोजन, उत्पादन वाढ, खर्च नियंत्रण आणि अचूक निर्णय यासाठी AI कसे उपयुक्त ठरू शकते, हे शेतकऱ्यांना समजणार आहे. भारतीय शेती ‘स्मार्ट युगात’ प्रवेश करत असल्याचे हे ठळक उदाहरण असल्याचे राजेंद्र पवार यांनी सांगितले.



दुसरी मोठी क्रांती म्हणजे ऊस उत्पादनात झालेली अभूतपूर्व वाढ. या प्रदर्शनात एकरी तब्बल २०० टन उत्पादन देणाऱ्या उसाचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. तसेच साधारण ५० टन उत्पादन देणारा खोडवा ऊस योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने १५० टनांपर्यंत कसा वाढवता येतो, हेही प्रत्यक्ष दाखवले जाणार आहे. यासोबतच मका, कांदा, तूर आणि केळी यांसारख्या पिकांची आधुनिक प्रात्यक्षिकेही शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत.

तिसरी बाब म्हणजे भीमथडी घोड्यांचे पुनरुज्जीवन. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या देशी जातीला एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. वेग, ताकद आणि चपळतेसाठी प्रसिद्ध असलेला भीमथडी घोडा ‘घोड्यांमधील फरारी’ म्हणून ओळखला जातो. ही केवळ पशुसंवर्धनाची नव्हे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची जपणूक असल्याचे चित्र येथे पाहायला मिळणार आहे.

चौथी बाब म्हणजे भरडधान्यांचा बदललेला प्रवास. एकेकाळी गरिबांचे अन्न मानले जाणारे भरडधान्य आज आरोग्यदायी आहार म्हणून श्रीमंतांच्या ताटात पोहोचले आहे. या बदलाचा वेध घेत प्रदर्शनात विविध भरडधान्ये आणि त्यावर आधारित आधुनिक प्रक्रिया केलेले पदार्थ, जसे की भरडधान्याची स्पॅगेटी, शेतकरी व तरुण पिढीसमोर मांडण्यात येणार आहेत.



पाचवी आणि महत्त्वाची बाब म्हणजे जागतिक तंत्रज्ञानाचा संगम. इस्रायल, नेदरलँड्स, चीन, ब्राझील, जर्मनीसह १५ ते २० देशांतील अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान या प्रदर्शनात एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सोलर पॉलीहाऊस, हायड्रोपोनिक्स, रोबोटिक शेती यांसारखी प्रात्यक्षिके शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत.



थोडक्यात सांगायचे तर, ‘कृषी 2026’ हे केवळ कृषी प्रदर्शन नसून, भारतीय शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी उघडलेली एक नवी दारे आहेत. या प्रदर्शनाचा लाभ शेतकरी, युवक आणि सर्वसामान्यांनी घ्यावा, असे आवाहन राजेंद्र पवार यांनी केले आहे.

Thursday, January 8, 2026

वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई; शेळी-बोकड चोरी करणारी टोळी जेरबंद

 

वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई; शेळी-बोकड चोरी करणारी टोळी जेरबंद, १२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त



बारामती | प्रतिनिधी


बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या शेळ्या व बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १२ लाख ९५ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून टोळीतील एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

शेळी-बोकड चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले होते. याची दखल घेत वडगाव निंबाळकर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून अशोक बाबुराव जाधव याला अटक केली. या टोळीतील आणखी दोन आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या अशोक बाबुराव जाधव याच्यावर वडगाव निंबाळकर, लोणंद आणि हडपसर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडील पिक-अप वाहनाची तपासणी केली असता २ तलवारी, ३ कोयते, १ लोखंडी रॉड, १ स्क्रू ड्रायव्हर, १ तार कटर, १ चाकू, १ लाकडी काठी आणि १ प्लास्टिक पाईप असा घातक मुद्देमाल जप्त करण्यात आला.


ही टोळी इतरही गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू असल्याचे वडगाव निंबाळकर पोलिसांनी सांगितले आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Tuesday, January 6, 2026

"विस्तव तळहातावर घेऊनही निर्भय पत्रकारिता सुरू आहे" : भरत निगडे नीरा कन्या विद्यालयात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा

"विस्तव तळहातावर घेऊनही निर्भय पत्रकारिता सुरू आहे" : भरत निगडे 


नीरा कन्या विद्यालयात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा 



नीरा :

    “पत्रकारितेचा विस्तव आम्ही तळहातावर घेऊन आमच्या ग्रामीण भागातील पत्रकारांची सुरू आहे. तो विस्तव भाजत असला, तरी चेहऱ्यावर वेदना दाखवणार नाही. पत्रकारिता हा आमच्यासाठी केवळ व्यवसाय नसून आनंदाने स्वीकारलेले व्रत आहे. परिणामांची पर्वा न करता समाजातील चांगल्या-वाईट घटना निर्भयपणे लोकांसमोर मांडणे, हाच आमच्या पत्रकारितेचा खरा उद्देश आहे.” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी केले. 



     पुरंदर तालुक्यातील नीरा येथील सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यामंदिर येथे मंगळवारी (ता. ६) मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकारांचा शाल व गुलाबाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. 


         यावेळी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभाग सल्लागार समिती सदस्य लक्ष्मणदादा चव्हाण, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गांधी, ॲड. आदेश गिरमे यांच्यासह नीरा परिसरातील ज्येष्ठ व युवा पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास पत्रकार बाळासाहेब ननावरे (पुढारी), भरत निगडे (लोकमत), रामदास राऊत (केसरी), राहुल शिंदे (प्रभात), किशोर कुदळे (सकाळ), महम्मदगौस आतार (सामना), सुभाष जेधे (मराठी रोखठोक), विजय लकडे पुरंदर रिपोर्टर), अमोल साबळे (रिपब्लिकन भारत), महेश जेधे, सचिन मोरे यांच्यासह विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला माने व पर्यवेक्षिका अनुराधा उरमोडे उपस्थित होत्या. 



      पत्रकार भरत निगडे यांनी पत्रकारांचे समाजातील स्थान स्पष्ट केले. तर सुभाष जेधे, महेश जेधे आणि अमोल साबळे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत पत्रकार दिनाचे महत्त्व आपल्या ओघवत्या शैलीत मांडले. ॲड. आदेश गिरमे यांनी पत्रकारांना शुभेच्छा देत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. 



     कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या उपशिक्षिका शिवाई मधे यांनी केले. आभार मुख्याध्यापिका निर्मला माने यांनी केले. पत्रकारांच्या समाजप्रबोधनातील योगदानाचा सन्मान करण्याचा आनंद विद्यालयाला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी खोपे व माया गायकवाड यांनी केले. 


        कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार महेश जेधे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थिनींना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. किरण शेटे, कुणाल खैरकार, अनिल कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. 

---

Monday, January 5, 2026

दर्पण ते ‘गोदी मीडिया’ : माध्यमांच्या अधोगतीचा प्रवास

 

दर्पण ते ‘गोदी मीडिया’ : माध्यमांच्या अधोगतीचा प्रवास 



मुंबई : 

      ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू केले. या ऐतिहासिक घटनेला उद्या १९४ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी पत्रकारितेचा तो जन्मकाळ केवळ माध्यमाचा आरंभ नव्हता, तर सामाजिक, वैचारिक आणि राष्ट्रीय जागृतीचा प्रारंभ होता. 


      दर्पण सुरू झाले तेव्हा देश पारतंत्र्यात होता. इंग्रज सत्तेच्या जोखडाखाली दबलेल्या समाजाला जागे करण्याचे, शिक्षित करण्याचे आणि अन्यायाविरुद्ध उभे करण्याचे महत्त्वाचे काम त्या काळातील पत्रकारांनी आपल्या लेखणीतून केले. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक क्रांतिकारक हे पत्रकारही होते. पत्रकारिता ही तेव्हा मिशन होती, धंदा नव्हता. लेखणी ही तलवार होती आणि वृत्तपत्रे ही परिवर्तनाची रणभूमी होती. 


        स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजकीय व सामाजिक रचनेत बदल झाले, तसेच माध्यमांचे प्राधान्यक्रमही बदलत गेले. लोकशिक्षण हे माध्यमांचे मूलभूत उद्दिष्ट हळूहळू मागे पडले. त्याजागी लोकरंजन आले आणि आज दुर्दैवाने माध्यमांची वाटचाल सत्तानुनय या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. 


       आज अनेक भांडवलदारी माध्यमांना सत्ताधाऱ्यांभोवती आरत्या ओवाळणे, त्यांच्या चुका झाकणे, प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे, एवढेच आपले काम असल्याचा भ्रम झालेला दिसतो. सत्तेला आरसा दाखवण्याऐवजी आरशालाच वाकवण्याचे काम माध्यमांकडून सुरू आहे. 


        यातूनच “गोदी मीडिया” ही ओळख माध्यमांना मिळाली आहे. ही ओळख कोणतेही भूषण नाही; ती लाजीरवाणी आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची ही अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. 


      मात्र या अंधारातही काही आशेचे किरण आहेत. आजही असंख्य पत्रकार सत्यासाठी लढत आहेत. लोकशाही, संविधान, माध्यम स्वातंत्र्य यांचे रक्षण करण्यासाठी आपली लेखणी झिजवत आहेत. धर्मांध, फूट पाडणाऱ्या शक्तींविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत आहेत. त्यांच्यावर दबाव आहे, धमक्या आहेत, आर्थिक असुरक्षितता आहे; तरीही ते माघार घेत नाहीत. 


      अशा पत्रकारांना केवळ शुभेच्छाच नव्हे, तर समाजाच्या सहकार्याची, पाठिंब्याची नितांत गरज आहे. किमान सुबुद्ध जनतेने तरी सत्य बोलणाऱ्या पत्रकारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. कारण पत्रकारिता वाचली तरच लोकशाही वाचेल. 


       पत्रकार दिनाच्या निमित्ताने या संघर्षरत, निर्भीड आणि प्रामाणिक पत्रकारांना सलाम. 


पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा! 


— एस. एम. देशमुख

मुख्य विश्वस्त

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई

---

Saturday, January 3, 2026

'मी व संभाजी कु़जीर आमदार होण्यात लक्ष्मणदादांचा मोठा वाटा' - माजी आ. अशोकराव टेकवडे यांचे प्रतिपादन - नीरा येथे लक्ष्मणराव चव्हाण यांचा ८३ वा वाढदिवस साजरा

 'मी व संभाजी कु़जीर आमदार होण्यात लक्ष्मणदादांचा मोठा वाटा'  - माजी आ. अशोकराव टेकवडे यांचे प्रतिपादन 


- नीरा येथे लक्ष्मणराव चव्हाण यांचा ८३ वा वाढदिवस साजरा 



नीरा : प्रतिनिधी 


         'सन २००४ मध्ये मला आमदारकीला उभे राहण्यास दादांनी माझ्यात मोठा आत्मविश्वास निर्माण केला. तसेच मी आमदार होण्यात ज्या ज्या लोकांनी मला साथ दिली त्यामध्ये तसेच सन १९८० मध्ये संभाजी कुंजीर यांना निवडून आणण्यास लक्ष्मणदादा चव्हाण यांचा मोठा वाटा' असल्याचे प्रतिपादन पुरंदरचे  माजी आ. अशोक टेकवडे यांनी नीरा येथे केले.

         पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचंतन सोहळा नीरा ( ता.पुरंदर) येथे पार पडला. त्यावेळी माजी आ. अशोक टेकवडे बोलत होते.

       टेकवडे पुढे म्हणाले की, 'पुरंदरच्या जडणघडणीत दादांचा मोठा वाटा असून माझ्या ४१ वर्षाच्या राजकीय सहवासात लक्ष्मणदादा चव्हाण यांनी माझ्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांना वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन करून राजकारणात उत्तम कार्यकर्ते घडविले. लक्ष्मणदादांनी समाजकारण व राजकारण करताना आदर्श कुटूंब कसे असावे याचे उत्तम उदाहरण घालून दिले'. 

      यावेळी  पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, माजी जि.प.सदस्य सुदामराव इंगळे, विजयराव कोलते, सोमेश्वरचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप, माजी चेअरमन राजवर्धन शिंदे,‌ जि.प.चे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, राष्ट्रवादीचे तालुका‌ध्यक्ष उत्तम धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय निगडे, सचिन लंबाते, माजी सभापती व शिवसेनेचे नेते अतुल म्हस्के, सोमेश्वरचे व्हा.चेअरमन  मिलिंद कांबळे, संचालक जितेंद्र निगडे, कांचन निगडे, नंदुकाका जगताप, उदय काकडे, ग्रा.पं.सदस्य प्रमोद काकडे, संदीप धायगुडे, डॉ.वसंतराव दगडे, कल्याण जेधे यांच्यासह नीरा व परिसरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व ग्रामस्थांनी लक्ष्मणदादा चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या. 


     यावेळी चव्हाण कुटूंबियातील माजी बांधकाम सभापती दत्ताजी चव्हाण, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राजेश चव्हाण, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, सुनिल चव्हाण, अँड. पृथ्वीराज चव्हाण, दयानंद चव्हाण यांच्यासह नीरेतील चव्हाण  मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

       यावेळी माजी बांधकाम सभापती दत्ताजी चव्हाण यांनी स्वागत केले तर ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण यांनी आभार मानले. 


-----------------------------------------------------------------

                चौकट 


'राजकारणांत लक्ष्मणदादांसारखी उंची गाठता आली पाहिजे' - प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे 


     'लक्ष्मणदादा चव्हाण हे आमदार, मंत्री नसताना देखील त्यांचे अभिष्टचंतन करण्यासाठी विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी उपस्थित राहिले. हे केवळ दादांनी विविध राजकीय पक्षातील जोडलेली माणसे आहेत. माणसं माणसात आणणारे, राजकारणात कितीही मोठ्या संघर्षाची वेळ आली तरी दादा चांगली भुमिका घेतात. कधीही राजकारणात व समाजकारणात संधी मिळाली तर पाय जमिनीवर ठेवले पाहिजे. अशा प्रकारची राजकारणात उंची लक्ष्मणदादांसारखी गाठता आली पाहिजे' असे मत जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले.

-----------------------------------------------------------------

Monday, December 29, 2025

नीरा रेल्वे स्थानकात भीषण अपघात; प्रवाशाचे दोन्ही पाय चुरडले रेल्वे पोलिस व आरपीएफ मदतील आले नसल्याचा गंभीर आरोप

 

नीरा रेल्वे स्थानकात भीषण अपघात; प्रवाशाचे दोन्ही पाय चुरडले 


रेल्वे पोलिस व आरपीएफ मदतील आले नसल्याचा गंभीर आरोप 



नीरा : प्रतिनिधी 


     सोमवारी (दि.२९) सायंकाळी नीरा रेल्वे स्थानकात पुणे–सातारा डेमो रेल्वेमधून उतरत असताना एका तरुणाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तरुणाचे दोन्ही पाय रेल्वेखाली सापडून पूर्णतः चुरडले गेले असून त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. 


     आदित्य साहेबराव होळकर (वय १८, रा. सोमेश्वरनगर, ता. बारामती) असे जखमी तरुणाचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डेमो रेल्वे नीरा स्थानकात थांबत असताना आदित्य उतरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी तोल गेल्याने तो थेट रेल्वेखाली गेला आणि भीषण अपघात घडला. 


     अपघातानंतर रेल्वे पोलिस, आर.पी.एफ. तसेच नीरा रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांनी जखमी प्रवाशाला तत्काळ मदत न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे नीरा रेल्वे स्थानकातील पोलीस मदत केंद्राला कुलूप लागलेले असून आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्याचे चित्र दिसून आले. ही बाब अत्यंत संतापजनक असून रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 


      दरम्यान, स्थानिक तरुण मदतीला धावून आले. प्रहार संघटनेच्या रुग्णवाहिकेतून जखमी आदित्यला प्रथम लोणंद, त्यानंतर जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील संचेती रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 


     या घटनेची वरिष्ठ कार्यालयाने तातडीने गंभीर दखल घ्यावी, निष्काळजी कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई करावी तसेच नीरा रेल्वे स्थानकातील सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थेचा तात्काळ आढावा घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Saturday, December 27, 2025

बाबुर्डी येथे MAHAVISTAR AI अ‍ॅपचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 बाबुर्डी येथे MAHAVISTAR AI अ‍ॅपचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 



बारामती : 

         डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक शाश्वत व लाभदायक व्हावी, या उद्देशाने कृषी विभागामार्फत बाबुर्डी (ता. बारामती) येथे कृषीदूतांच्या माध्यमातून कृषी खात्याच्या MAHAVISTAR AI अ‍ॅपचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 


        कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपक्रमांतर्गत बाबुर्डी गावात कृषीदूतांनी शेतकरी व ग्रामस्थांना कृषी खात्याच्या MAHAVISTAR AI अ‍ॅपचे सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या हवामान परिस्थितीत आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल साधनांचा वापर करून शेती अधिक सक्षम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे कृषीदूतांनी सांगितले. 


      या कार्यक्रमात MAHAVISTAR AI अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक नियोजन, हवामान अंदाज, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, बाजारभावाची अद्ययावत माहिती तसेच विविध शासकीय कृषी योजनांची माहिती कशी मिळवता येते, याचे प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले. मोबाईलमध्ये अ‍ॅप कसे डाउनलोड करावे, नोंदणी प्रक्रिया कशी करावी व प्रत्यक्ष शेतीसाठी त्याचा वापर कसा करावा, याबाबतही कृषीदूतांनी मार्गदर्शन केले. 


       यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी अ‍ॅपविषयी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. डिजिटल तंत्रज्ञानामुळे निर्णय घेणे अधिक सोपे होणार असून शेतीत उत्पादनवाढीसोबतच खर्चात बचत होण्यास मदत होईल, अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 


       कृषीदूतांनी शेतकऱ्यांनी MAHAVISTAR AI अ‍ॅपचा नियमित वापर करून आधुनिक शेतीकडे वाटचाल करावी, तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या अ‍ॅपचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन केले. 


    या कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमात सुरज मुळे, अभय धुमाळ, ताहीर तांबोळी, चैतन्य तुपे, शुभम धुमाळ, विश्वविजय मिसाळ तसेच कृषीसेवक दिलीप यादव यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे बाबुर्डी गावातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख मिळाल्याने समाधान व्यक्त

 करण्यात आले.

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...